जागतिक वन दिन विशेष : निसर्गसंवर्धनाची हाक आणि कृतीतून दिलेला संदेश.
शनिवार, 21 मार्च 2026
1 Comment
• वनसंरक्षण व वनसंवर्धन ही काळाची गरज - डॉ. देवानंद नंदागवळी.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- दरवर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिकता नसून, मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं अधिक दृढ करण्याची जाणीव करून देणारा आहे. वन म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुसे—जीवनदायी, संतुलन राखणारी आणि संपूर्ण सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवणारी अमूल्य संपत्ती.
आजच्या आधुनिक युगात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, पूर-दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता याचाच परिणाम आहे. वनांचा ऱ्हास म्हणजे सृष्टीच्या संतुलनाला तडा जाणे होय.
कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाने अनुभवले. त्या कठीण काळाने आपल्याला शिकवले की, झाडेच आपले खरे जीवनदाता आहेत. त्यामुळे वनसंवर्धन ही केवळ गरज नसून, आपल्या अस्तित्वाची हमी आहे.
याच पार्श्वभूमीवर, जागतिक पर्यावरण दिन निमित्त इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, शहापूर येथील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत संकुल परिसरात उत्साहात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा प्रेरणादायी संदेश दिला.
या उपक्रमात वृक्ष लागवडीचे महत्त्व, पर्यावरण संतुलनात झाडांची भूमिका तसेच विकासाच्या नावाखाली वाढत्या वृक्षतोडीचे दुष्परिणाम, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत “एक विद्यार्थी – एक झाड” हा संकल्प स्वीकारण्याचे आवाहन करुन , “आज एक झाड लावले, तर उद्याचे जीवन सुरक्षित राहील”, "वृक्ष आहेत तरच भविष्य आहे”. जागतिक वन दिन हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा संदेश आहे. आज घेतलेला छोटासा संकल्प उद्याच्या पिढ्यांसाठी हिरवागार आणि सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतो असे मार्गदर्शन डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले.
वनसंवर्धनासाठी केवळ शासन नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. वृक्षारोपण, झाडांचे संगोपन, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा स्वीकार केल्यासच खरे परिवर्तन घडू शकते. असा या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला—
कार्यक्रमात प्रवीण भोंदे, विलास चामट, गणेश वहाने, नितीन वहाने, नरेश पडोळे, निखिल बदने, नुपूर भोंदे, ऋत्विका भोंदे, ऋना कळंबे, वेदिका गणवीर, श्रेया पेशने, अवनी भोंदे, हिरल घरडे, पूर्वी भोंदे, अक्षरा डोईफोडे, आराध्या भोंडेकर, समीक्षा गायधनी, मुनेश्वरी पेशने, कशीश वासनिक, श्रिधा भोंदे तसेच अनेक विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
वृक्षतोड थांबवून जंगलाचे संरक्षण करुया, प्रति व्यक्ती एक तरी झाड लावण्याच्या व त्याला जगविण्याचा निर्धार करूया...
जवाब देंहटाएं