तेरा वर्षीय विद्यार्थ्यावर सहविद्यार्थ्यांचा प्राणघातक हल्ला; दोन महिन्यांनी अखेर गुन्हा दाखल.
सोमवार, 8 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ येथील स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालयात तेरा वर्षीय विद्यार्थ्यावर सहविद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याने जिल्हा हादरला आहे. वर्गातील शिस्त पाळण्यास सांगितल्याच्या रागातून चार विद्यार्थ्यांनी वर्ग कॅप्टन जय खोमदेव हलमारे (वय १२) याच्यावर डिव्हायडर, काठी आणि लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केला. दोन महिन्यांच्या चौकशीनंतर लाखनी पोलिसांनी आता विधीसंघर्ष चारही अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जय हलमारे हा ७ वीचा विद्यार्थी विद्यालयाच्या निवासी वस्तीगृहात राहून शिक्षण घेत होता. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे तो झोपेत असताना त्याच वर्गातील चार विद्यार्थ्यांनी त्याच्यावर नियोजितपणे हल्ला चढवला. डिव्हायडरने गळा, पोट, डोके व गुप्तांगावर वार, तसेच लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या क्रूर मारहाणीमुळे जय बेशुद्ध झाला.
घटना लपविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांनी “मुलगा पलंगावरून पडला” असा खोटा अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. जयला लाखनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून भंडारा जिल्हा रुग्णालयात, आणि पुढे नागपूर येथील स्टार सिटी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तो काही दिवस कोमात होता. १२ ऑक्टोबर रोजी शुद्धीवर आल्यानंतर जयने स्वतः हल्लेखोरांची माहिती पालकांना दिली.
पिडीत विद्यार्थ्याचे पालक लाखनी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास गेले असता, तेथील पोलीस निरीक्षकांनी विविध कारणे सांगून एफआयआर घेण्यास नकार दिल्याचा आरोप पालकांनी केला. तब्बल दोन महिने प्रकरण दडपून ठेवल्यानंतर अखेर ४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. वैद्यकीय तपासणीनुसार जयच्या मेंदूवर गंभीर मार असून तो व्यवस्थीत बोलू शकत नाही.
या प्रकरणात केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्ली यांच्या हस्तक्षेपानंतरच कारवाईला गती मिळाली. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार (लिगल एडवायजर) आणि पदाधिकारी आणि पालकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच प्रकरण सरकारदरबारी पोहोचले. पोलीस व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी उशिरा का होईना, जबाबदारीने कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.
गंभीर बाब म्हणजे, याच विद्यालयात गेल्या वर्षी २१ जुलै २०२४ रोजी विद्यार्थी धीरज सिताराम फरदे याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या पालकांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. यावरून शाळा व वस्तीगृहातील गंभीर निष्काळजीपणा स्पष्ट होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पिडीत कुटुंबाची व मानवाधिकार संस्थेची प्रमुख मागणी
1. मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व वस्तीगृह कर्मचाऱ्यांवर IPC कलम २०१, १२०(B), ३४ नुसार कारवाई करावी.
2. शाळा व वस्तीगृहाची मान्यता रद्द करण्यात यावी.
3. जयच्या उपचार व पुनर्वसनासाठी शासनाकडून मदत व भरपाई द्यावी.
या प्रकरणातील अजून दोषी अद्याप मोकाट असून “खरे दोषी लवकरच जाळ्यात सापडतील” अशी आशा पालक व मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांनी व्यक्त केली आहे. न्यायव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Response to "तेरा वर्षीय विद्यार्थ्यावर सहविद्यार्थ्यांचा प्राणघातक हल्ला; दोन महिन्यांनी अखेर गुन्हा दाखल."
एक टिप्पणी भेजें