चिमूर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण पोहोचले राज्य महिला आयोगाच्या दरबारात !
रविवार, 22 फ़रवरी 2026
Comment
• दोन महिण्यापासून संशयित आरोपी फरार-महिला सामाजिक संघटना गप्प का?
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
चंद्रपूर :- चिमूर येथील ठक्कर वार्ड, पेठ मोहल्ला येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण आता राज्य महिला आयोगाचे दरबारात पोहोचल्याने प्रशासकीय यंत्रणेत खडबड माजली आहे. अपहरणग्रस्त मुलीच्या वडिलांची बाजू राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या समक्ष शिवसेनेच्या माजी जिल्हा महिला प्रमुख कुसुमताई उदार यांनी मांडली. आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
चिमूर येथील ठक्कर वार्ड येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची तक्रार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी मुलीच्या वडिलांनी चिमूर पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीनुसार अपहरणग्रस्त मुलगी ही डोंगरवार चौकातील परी ब्युटी पार्लर येथे दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता गेली होती. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती मिळाली नाही, इंदिरानगर चिमूर येथील करण उर्फ गणेश विलास गोठे यांच्यासोबत तिचे मोबाईलवर बोलणे सुरु असायचे. या माहितीवरून मुलीचे वडील हे करण उर्फ गणेश विलास गोटे यांच्या घरी गेले असता विलास गोटे यांनी सांगितले की माझा मुलगा करण यांनी तुमची मुलगी सोबत नेली आहे, दोन आणून देतो असे कबूल केले. दोन दिवस मुलीची वाट बघून शेवटी चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) नुसार गुन्ह्याची नोंद करून चौकशीला प्रारंभ केला. मात्र संशयित फरार आरोपी करण विलास गोठे व अपहरणग्रस्त मुलीच्या शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले. मुलीच्या वडिलांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून तालुका व उपविभागीय दंडाधिकारी यांचेसह पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात विनंती अर्ज केले होते. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.
शेवटी महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार होता. त्यामध्ये मुलीच्या वडिलांनी आपली लेखी स्वरूपात व्यथा मांडली. सोबतच शिवसेना महिला नेत्या कुसुमताई उदार यांनी आयोगामुढे तोंडी माहिती देऊन अपहरणग्रस्त मुलीच्या वडिलांची बाजू मांडली.
"मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर माझ्या मुलाचे मोठ्या उत्साहात लग्न लावून देतो त्यानंतर कोणीही आमचे काहींही बिघडवू शकत नाही असे संशयित फरार आरोपी करण विलास गोठे यांचे वडील विलास गोठे हे सार्वजनिक ठीकाणी बोलत आहेत. याचा अर्थ आरोपी कुठे आहे याबाबत विलास गोठे यांना माहिती असावी हि बाब शिवसेनेच्या माजी महिला जिल्हा अध्यक्ष कुसुमताई उदार यांनी महिला आयोगाच्या लक्षात आणून दिली. सर्व बाजू ऐकून आयोगाने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
0 Response to "चिमूर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण पोहोचले राज्य महिला आयोगाच्या दरबारात !"
एक टिप्पणी भेजें