पॅनल 18 मधील दहा चाळ परिसरात पाण्याचा थेंब-थेंब संघर्ष; नागरिक संतप्त.
शुक्रवार, 22 मई 2026
Comment
• अधिकाऱ्यांची उदासीनता, रात्रीच्या अंधारात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ.
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- पॅनल 18 येथील दहा चाळ परिसरात गेल्या महिनाभरापासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मात्र झोपेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वॉलमन तसेच अभियंता मिरकुटे यांना अनेकदा फोनद्वारे माहिती देण्यात आली, मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा सुमारे 10.30 नंतर पाणीपुरवठा सुरू होतो, पण त्याचवेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणी भरताही येत नाही. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे पाण्यासाठी वणवण… प्रशासनाने नागरिकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.
या गंभीर समस्येची दखल घेत आज दिनांक 21 मे रोजी ॲड. प्रशांत चंदनशिव आणि रवींद्र राडे यांनी कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांना लेखी निवेदन देत पाण्याचा दाब तातडीने वाढवावा तसेच पाणीपुरवठ्याची वेळ बदलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का? की दहा चाळकरांना अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
0 Response to "पॅनल 18 मधील दहा चाळ परिसरात पाण्याचा थेंब-थेंब संघर्ष; नागरिक संतप्त."
एक टिप्पणी भेजें