महामानवा -- कृतज्ञ अभिवादन!..
शुक्रवार, 5 दिसंबर 2025
Comment
प्रभाकर सोमकुवर
नागपूर
दुरध्वनी क्र : 9595255952
पाच हजार वर्षे हिंदू समाजाने अस्पृश्यांचा जो अमानवियअमानुष छळ केला. त्याला त्या समाजाकडुन मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तीमंत बंड त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुल्माविरुघ्द उभारलेली व्रजाची मूठ होय, आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेले “भिमाची गदा” होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथडा फोडुन त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनखं होय. आंबेडकर म्हणजे समाजातील सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द पुकारलेले एक युध्दच होय.
डॉ. बाबासाहेबांनी बौध्द धर्म स्वीकारला, धम्मचक्र प्रवर्तन केले. पण त्यातून आजच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या सर्व प्रशनांचा सांगोपांग विचार पुन्हा पुन्हा केला. तो विचार चालू ठेवण्याला, त्यातून आजच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याला ते स्वत: राहिले नाहीत. ही एक खरोखरच अत्यंत दुर्देवी घटना समजली पाहिजे.
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ते सर्व प्रश्न अधीकच जिवंत, ज्वलंत आणि स्फोटक बनले आहेत. त्यामधील गुंतागुंतही वाढली आहे. आंबेडकरांच्या पश्चात त्यांची जयंती, महापरिनिर्वाण दिन-दिशा दिन वगैरे सर्व समारोह कसोशीने, निष्ठेने, उत्साहाने, नियमितपणे पाळण्यात येतात. पण बुध्दधम्म स्वीकारण्यापूर्वी आणि नंतर ज्या प्रश्नांचा विचार डॉ. बाबासाहेब स्वत: सतत अहोरात्र करीत होते. त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मात्र नंतर कोणी फारसा केलेला दिसत नाही. गौतम बुध्दांच्या जीवनांत त्याचे विचार मंथन अखेरच्या क्षणापर्यंत चालूच होते. पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांच्या निष्ठावंत शिष्यांनी आणि अनुयायांनी बदललेल्या परिस्थितीच्या आणि प्रश्नांच्या संदर्भात आपले विचारमंथन सतत चालूच ठेवले. बौध्द विचार बुध्दांच्या हयातीत कधी कुंठित झाला नव्हता. बुध्दाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सदा विकासी सदा जिवंतच राहिला. विचाराला पूर्णविराम केव्हाच नसतो. हे बुध्दाता पुरते ठाऊक होते. प्रत्येक खऱ्या बौध्दालाही ते महान सत्य ध्यानात ठेवावेच लागते. डॉ. बाबासाहेबांनी ही आपलया उभ्या आयुष्यात विचारांचा पूर्णविराम कधीच लावला नाही. त्यांचे जिवन आणि विचार सदा जीवंत, ज्वलंत, सदा विकासशील असेच राहिले. नवीन परिस्थिती आणि नवीन प्रश्न यांचे आव्हान सतत स्विकारुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार सतत विकास पावले.
भारतातील एक महान व्यक्ती नाहिशी झालेली आहे, असे म्हटल्यास त्यात मुळीच अतिश्योक्ती नाही. त्यांचे दांडगे व्यक्तिमत्व, त्यांची प्रगाढ विद्वता, अप्रतिम भाषापांडित्य व महान पंडितांनाही प्रसंगविशेषी निरुत्तर करुन सोडणारा मार्मिक कोटीक्रम इत्यादि गुणामुळेच त्यांची महानता अलिकडील काळात विशेष प्रकर्षाने अखील भारतीय जनतेच्या प्रत्ययास येऊ लागली आहे. अस्पृश्याचे एकमेव नेते व खरे कैवारी म्हणून त्यांनी जितका लौकिक संपादन केला होता, त्यापेक्षा भारतीय घटनेचे एक महान शिल्पकार म्हणून त्यांनी कितीतरी अधीक पटीने लौकिक कमविलेला आहे. भारतीय घटना तयार करतांना त्यांनी कल्पनातीत परिश्रम घेतले व असामान्य बुध्दिमत्ता प्रगट केली. ही खरोखरच संस्मरणीय म्हणावी लागेल. 69 व्या महापरिनिर्वाण निमित्त कृतज्ञ अभिवादन!..
संकलन
हर्षवर्धन देशभ्रतार
0 Response to "महामानवा -- कृतज्ञ अभिवादन!.."
एक टिप्पणी भेजें