हवामान बदलाचा मका पिकाला फटका!.. शेतकरी चिंतेत.
शुक्रवार, 23 जनवरी 2026
Comment
राजन मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर :- सतत बदलणाऱ्या हवामानाचा आणि लहरी निसर्गाचा मोठा फटका आता शेती पिकांना बसू लागला आहे. बारव्हा परिसरात यंदा धान पीक परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मका पिकाची लागवड केली होती. सद्यस्थितीत मका पीक जोमात असले तरी, गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी कडाक्याची थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पारंपारिक धान शेतीमध्ये वाढलेला खर्च आणि मिळणारा कमी मोबदला यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. त्यावर पर्याय म्हणून बारव्हा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी मका पिकाकडे आपला मोर्चा वळवला. सुरुवातीला पोषक वातावरण असल्याने मका पिकाची वाढ जोमाने झाली, मात्र आता ऐन वेळी निसर्गाने पाठ फिरवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. विशेषत रात्रीच्या वेळी तापमानात मोठी घट होत असल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे.दिवसभर आकाश ढगाळ राहत असल्याने सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही.
अशा वातावरणात मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
मका पीक सध्या संवेदनशील अवस्थेत आहे. जर हवामान लवकर पूर्ववत झाले नाही, तर दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. यामुळे मक्याच्या कणसाचा आकार लहान राहणे किंवा दाणे न भरणे असे प्रकार घडून उत्पादनात मोठी घट येऊ शकते. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता या नैसर्गिक आपत्तीमुळे नवीन संकट उभे राहिले आहे.तरी
कृषी विभागाने याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवाव्यात.अशी मागणी आता जोर धरत आहे.
------------
आह्मी धाना ऐवजी मका लावला.कारण त्यात फायदा दिसेल असे वाटले होते. पीक सद्या चांगले आहे.पण हे ढगाळ वातावरण कायम राहिल्यास औषध फवारणीचा खर्च वाढेल.आणि पीक हातातून जाण्याची भीती आहे.
धनराज लंजे शेतकरी बारव्हा
0 Response to "हवामान बदलाचा मका पिकाला फटका!.. शेतकरी चिंतेत."
एक टिप्पणी भेजें