-->
मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा वाडेगावात भव्य समारोप.

मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा वाडेगावात भव्य समारोप.

• वैचारिक प्रबोधन, सामाजिक संवाद व एकतेचा जागर.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी
 
अकोला :- मराठा पाटील समाजात वैचारिक जागृती, सामाजिक संवाद आणि संघटित एकतेची भावना दृढ करण्याच्या उदात्त उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा प्रजासत्ताक दिनी, सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी वाडेगाव येथे अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि प्रेरणादायी वातावरणात भव्य समारोप झाला. ही पदयात्रा स्व. राजदत्त गुरुदत्त मानकर, संस्थापक अध्यक्ष मराठा पाटील समाज संघ, तालुका बाळापूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजदत्त मानकर यांचा जन्मदिवस हा संघटनेचा स्थापना दिवस म्हणून जाहीर करण्यात आला संघटनेचा पहिला वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न झाला.
        १७ जानेवारी २०२६ रोजी काजीखेड येथून प्रारंभ झालेल्या या संवाद पदयात्रेने तालुक्यातील विविध गावांमधून मार्गक्रमण करत समाजातील प्रश्न, अपेक्षा, अडचणी आणि उपाययोजनांवर थेट जनसंवाद साधला. गावोगावी समाज बांधवांशी संवाद साधत, सामाजिक जाणीव जागृती करत ही पदयात्रा वाडेगाव येथे दाखल झाली.

समारोपाच्या दिवशी सकाळी योगेश पाटील भटकर यांच्या निवासस्थानावरून टाळ–मृदुंगाच्या गजरात, वारकरी परंपरेची अनुभूती देणारी संवाद पदयात्रा मिरवणूक वाडेगावच्या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. जागोजागी रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, महिलांनी कुमकुम–तिलक लावून केलेले औक्षण, तर वारकऱ्यांच्या अभंग–भजनांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. चौका–चौकात पदयात्रेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
 पद यात्रेचा श्री जागेश्वर मंदिर, समारोप करण्यात आला.
      स्व. राजदत्त मानकर यांच्या त्रेपणव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी पदयात्रेत सहभागी झालेले मराठा पाटील समाज संघाचे अध्यक्ष शरद वानखडे, वसंतराव पोहरे शशिकांत नकासकर मोहन सरप गजानन हरणे, देवानंद साबळे रुपेश पटोकार मधुसूदन माळी मधुसूदन टिकार प्रशांत गायकवाड महेश लांडे धनंजय नेमाडे गणेश मुरूमकर अशोक नळकांडे हिम्मतराव मेटांगे विठ्ठल नळकांडे दत्तात्रेयभाऊ पाटील स्वामी मानकर यांच्यासह समाजाचे मान्यवर अशोक अमानकर, सेवाग्राम ताथोड, संदीप पाटील कृष्ण अंधारे, बाळासाहेब ताथोड पप्पू पाटील तिडके आदी समाजातील मान्यवर मंचावर उपस्थित होते.
      याप्रसंगी मराठा पाटील संघाचे अध्यक्ष शरद वानखडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत स्व. मानकर यांच्या समाजनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. समाज संघटन, संवाद आणि परिवर्तन हीच काळाची गरज असून, अशा उपक्रमांतून समाज अधिक सशक्त होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पुढील काळात कृषी, शिक्षण ,आरोग्य, लग्न समारंभ तेरवी ,गोड जेवण आदि अनिष्ट चालीरीतीच्या विरोधात काम करण्याचा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात आला.
     या समारोपीय कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरांतील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजहितासाठी अखंड कार्यरत असलेल्या स्व. राजदत्त मानकर यांच्या विचारांना व कार्याला ही पदयात्रा एक भावपूर्ण मानवंदना ठरली. तालुकाभर समाजाला संघटित करून वैचारिक जागृती निर्माण केल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समारोपानंतर हा कार्यक्रम समाजबंध अधिक दृढ करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हा भव्य समारोप सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त मराठा पाटील समाज, वाडेगाव येथील पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शशिकांत नकासकर यांनी केले, राष्ट्रगीताने समारंभाची सांगता करण्यात आली.

 

0 Response to "मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा वाडेगावात भव्य समारोप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article