लाखांदूर तालुक्यात स्मशानभूमीची जागा भूमाफियांच्या घशात ग्रामपंचायत प्रशासनाची 'बघ्याची' भूमिका.
बुधवार, 11 फ़रवरी 2026
Comment
राजन मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर :- एकीकडे सरकार गावागावात विकास पोहचल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र मृत्यूनंतरही माणसाला शांतता मिळेनाशी झाली आहे. गावागावातील स्मशानभूमीची आणि 'मरघट'ची राखीव जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारात ग्रामपंचायत प्रशासन मात्र मूक गिळून गप्प असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नियमानुसार प्रत्येक गावात अंत्यविधीसाठी आणि दफनविधीसाठी 'मरघट' किंवा स्मशानभूमीची शासकीय जागा राखीव असते. मात्र, लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये या जागेवर भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी वळवली आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून तिथे बांधकामे किंवा शेती केली जात आहे. परिणामी, गावात कोणाचा मृत्यू झाल्यास प्रेत जाळायचे कुठे किंवा दफन कुठे करायचे, असा भीषण प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.
अतिक्रमणधारकांच्या विरोधात ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत आहेत, आरडाओरड करत आहेत. मात्र, गावाच्या विकासाची आणि मालमत्तेची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. भूमाफियांना प्रशासनाचे छुपे पाठबळ तर नाही ना? अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामसेवकांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वांनीच या विषयावर 'बघ्याची' भूमिका घेतल्याने अतिक्रमणधारकांचे धाडस अधिकच वाढले आहे.
"जिवंतपणी छळ सोसला, आता मेल्यावर तरी हक्काची जागा द्या," अशी आर्त हाक ग्रामस्थ देत आहेत. स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि गरजेच्या जागेवर डल्ला मारणाऱ्या भूमाफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तात्काळ अतिक्रमणे हटवण्यात यावीत, अशी मागणी तालुक्यातील गावागावातून जोर धरत आहे.
0 Response to "लाखांदूर तालुक्यात स्मशानभूमीची जागा भूमाफियांच्या घशात ग्रामपंचायत प्रशासनाची 'बघ्याची' भूमिका."
एक टिप्पणी भेजें